3:
मुंबई :
महापालिका निवडणुकीनंतर आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर आले. या कार्यक्रमात ठाकरे बंधूंमधील आतापर्यंत न पाहिलेली केमिस्ट्री पाहायला मिळाली.
भाषण करताना राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी पहिल्यांदाच पक्ष सोडताना मनात असलेल्या भावना भर सभेत मांडल्या.
“मी जेव्हा बाहेर पडलो, त्या वेदना वेगळ्या होत्या. माझ्यासाठी तो पक्ष सोडण्याचा निर्णय नव्हता, तर घर सोडल्यासारखे होते,” असे भावनिक शब्द त्यांनी वापरले.
राज ठाकरेंचे हे शब्द ऐकताच उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. सभागृहात उपस्थित अनेकांची मने हेलावली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी सध्याच्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवरही परखड मत व्यक्त केले.
“आज जे काही सुरू आहे ते पाहता असे वाटते की बाळासाहेब नाहीत तेच बरे. महाराष्ट्राचे राजकारण सध्या गुलामांचा बाजार झाले आहे. माणसांचे लिलाव सुरू आहेत. कल्याण-डोंबिवलीतील राजकारण पाहून अंगावर शहारे आले. हे सगळं पाहून बाळासाहेबांना किती त्रास झाला असता,” असे ते म्हणाले.